नवी दिल्ली | New Delhi –
देशातील शेतकर्यांना कोणत्याही अडचणींशिवाय कर्ज देता यावे, यासाठी उपग्रहाचा वापर केला जात असल्याची माहिती आयसीआयसीआय बँकेने मंगळवारी दिली. उपग्रह छायाचित्राच्या माध्यमातून शेतकर्यांची नेमकी गरज जाणून त्यांना कर्ज दिले जात आहे. Satellite Technology
या नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यमान पत असलेल्या शेतकर्यांना त्यांची पात्रता वाढवण्यास मदत मिळते, तर प्रथमच कर्ज घेणार्या शेतकर्यांना त्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. कृषी कर्ज देताना जमीन, सिंचन, पीक पद्धती जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारी आयसीआयसीआय ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे. शेतकर्यांना वेगाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यासाठी लोकसंख्याशास्त्रीय आणि आर्थिक मापदंडासाठी प्रथमच आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे.
वित्तीय सेवा पुरवठ्या आयसीआयसीआय बँकेने नेहमीच सर्वप्रथम नवे तंत्रज्ञान आणले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करीत नव्या मार्गांचा वापर करीत या बँकेने 1998 साली पहिल्यांदा इंटरनेट बँकिंग सुरू केले. या बँकेने 2008 मध्ये सर्वप्रथम मोबाईल बँकिंग सुरू केले, 2012 मध्ये टॅब बँकिंग, 2012 मध्ये चोवीस तास सात दिवस टच बँकिंग सेवा, 2016 मध्ये सॉफ्टवेअर रोबोटिक्स आणि याच वर्षी खंडसाखळी उपाययोजना (ब्लॉक चेन) आणली, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची यांनी दिली. शेतकर्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या पत मूल्यांकनाकरिता उपग्रहीय माहिती व विश्लेषण करण्याचे नवे तंत्रज्ञान आणले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील काही वर्षांपासून पर्जन्यमान, तापमान, जमिनीच्या आद्रतेची पातळी, पाण्याची उपलब्धता, पीक पद्धती, पेरणी, पिकाचे नाव, संभाव्य पेरा आणि पीक कापणीची माहिती, पिकांची स्थिती, शेती नेमकी कुठे आहे, जमिनीती सीमा इत्यादी स्वरूपाची अत्यंत महत्त्वपूर्ण उपग्रहीय माहिती वापरली जात आहे. या व्यतिरिक्त जवळपासचे गोदामे आणि बाजार कुठे आहेत, हे देखील उपग्रहाच्या मदतीने तपासले जात आहे. पूर्वी या बाबी तपासण्यासाठी ग्राहक किंवा बँकेच्या प्रतिनिधीला दुर्गम भागात जावे लागायचे. आता उपग्रहाच्या मदतीने वेगवेगळी माहिती घेतली जात आहे.