कानपूर | Kanpur
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत (T20 Series) ३-० असे निर्भेळ यश संपादन करून टी २० मालिकेवर कब्जा करून प्रचंड लयीत असलेली टीम इंडिया (Team India) आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कसोटी मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे…
जूनमध्ये पार पडलेल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत (icc test championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२३ मध्ये होणाऱ्या नवीन पर्वाची नव्याने तयारी करण्यासाठी भारतीय संघ कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर उतरणार आहे. सामन्याला सकाळपासून सुरुवात झाली आहे.
भारतीय कसोटी संघातून सलामीवीर लोकेश राहुलला दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरला भारताच्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार असल्याचे जाहीर केले होते.
भारतीय कसोटी संघातून जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, विराट कोहली, रोहित शर्मा या सर्व अनुभवी आणि हुकमी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच तेज गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहंमद सिराज, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यावर असणार आहे.
टी २० मालिकेतील विश्रांतीनंतर कर्णधार केन विलियम्सन आणि कायल जेमिसन संघात परतल्यामुळे न्यूझीलंड संघ फलंदाजी आणि गोलंदाजीच्या तुलनेत भारतापेक्षा अधिक वरचढ दिसून येत आहे.
सलिल परांजपे, नाशिक.