Friday, July 31, 2026
Homeक्रीडाInd vs Sa 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा ४०८ धावांनी धुव्वा;...

Ind vs Sa 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा ४०८ धावांनी धुव्वा; दक्षिण आफ्रिकेनं मालिका २-० नं जिंकली

मुंबई । Mumbai

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ४०८ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला आहे. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने मोठी हार पत्करल्यामुळे दोन कसोटी सामन्यांची ही मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी क्लीन स्वीप करत जिंकली आहे.

- Advertisement -

यजमान भारतीय संघासमोर विजयासाठी ५४९ धावांचे प्रचंड मोठे लक्ष्य होते. मात्र, कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाचा संपूर्ण डाव अवघ्या १४० धावांमध्ये संपुष्टात आला. धावांच्या दृष्टीने भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. यापूर्वी, ३१ डिसेंबर १९५८ रोजी वेस्ट इंडिजने भारताला एक डाव आणि ३३६ धावांनी पराभूत केले होते. दक्षिण आफ्रिकेने ४०८ धावांनी विजय मिळवत, भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा हा जुना विक्रम मोडला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत पहिल्या डावात ४८९ धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात सेनुरन मुथुस्वामीने उत्कृष्ट फलंदाजी करत १०९ धावांचे शतक झळकावले. त्याला ट्रिस्टन स्टब्स (४९ धावा) आणि काइल व्हेरेन (४५ धावा) यांनी चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक चार बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने दोन बळी मिळवले.

दक्षिण आफ्रिकेच्या ४८९ धावांच्या मोठ्या धावसंख्येसमोर भारतीय संघ त्यांच्या पहिल्या डावात फक्त २०१ धावा करू शकला. त्यामुळे आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली आणि त्यांनी दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या उभारून भारतासमोर ५४९ धावांचे आव्हान ठेवले. भारताचा दारुण पराभव आणि मालिकेत झालेला क्लीन स्वीप यामुळे क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः संघ निवडीबद्दल आणि टीम इंडियातील खेळाडूंच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संघातील अनुभवाची कमतरता आणि त्या अनुषंगाने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा रंगू लागली आहे. संघातील अनुभवाच्या कमतरतेमुळे गौतम गंभीरच्या काही निर्णयांवरही आता शंका घेतली जात आहे.

ताज्या बातम्या

आज रंगणार ‘देशदूत शिलेदार पुरस्कार’ सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik समाजाच्या विविध स्तरांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘देशदूत’च्या वतीने यंदा प्रथमच ‘देशदूत शिलेदार पुरस्कार २०२६’ या भव्य...