नवी दिल्ली | New Delhi –
दहशतवाद्यांद्वारे भारतात हल्ले करण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नवी योजना तयार करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेमध्ये रावळिंपडी येथे एक गुप्त बैठक झाली असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Indian Intelligence
20 ऑगस्टला जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ मौलाना अब्दुल अशगरने रावळिंपडीत आयएसआयच्या दोन बड्या अधिकार्यांची भेट घेतली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अशगरचा भाऊ मौलाना अम्मार हा देखील उपस्थित होता. अम्मारने बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय विंगकमांडर अभिनंदन यांना मुक्त केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. सोबतच त्याने बालाकोटच्या तालीम-उल-कुरआन मदरशावरील हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली होती.
रावळिंपडीत अब्दुल रऊफ आणि आयएसआय यांच्यात झालेल्या बैठकीची आखणी इस्लामाबादच्या जैश मरकझने केली होती. दरम्यानच्या काळात जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अशगर खान काश्मिरी आणि कारी जरार याने भारतातील हल्ले आणखी तीव्र करण्यासाच्या योजनेवर चर्चा केली. गुप्तचर अधिकार्यांच्या मते, पुलवामा हल्ल्याच्या एक महिना आधीही पाकिस्तानात अशीच बैठक झाली होती.
अशगर खान हा काश्मिरी गुरिल्ला फोर्सचा कमांडर आहे. तो यापूर्वी हरकत-उल-मुजाहिदिनच्या मजलिस-ए-शूरासाठी काम करीत होता, तर कारी जरार व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी शिबिरांचा कमांडर आहे. 2016 मध्ये नगरोटा येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्याचाही तो सूत्रधार आहे