मुंबई / प्रतिनिधी Mumbai
राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणीसाठा, पीक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेची माहितीही मंत्रिमंडळाने घेतली.
राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत आणि नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मंत्री गिरीश महाजन, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, क्रीडा आणि युवक कल्याण दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून बचाव आणि मदत कार्यासाठी प्रभावी समन्वयन साधण्यात येत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून पाऊस, वीज सतर्कता याबाबत १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा आणि आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस ने सुसज्ज करण्यात आल्याची माहिती सेठी यांनी दिली.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशी चार पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्याचे सेठी यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयातील जलसाठा ११ टीएमसीने वाढल्याची माहिती दिली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी, गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात टँकरच्या संख्येत काही अंशी घट झाल्याची माहिती दिली. तथापि, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे खंदारे यांनी सांगितले.