श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ व सदर निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी कॅनॉल परिसरातील नागरिकांनी शहरातील गांधी पुतळा येथे कालपासून अमरण उपोषण सुरू केले आहे.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. शहरातील वॉर्ड क्र. 6 व 7, प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांना पाटबंधारे विभागाने 17 फेब्रुवारी रोजी राहती घरे अतिक्रमणात असल्याचे नमूद करून, दि.26 फेब्रुवारीपर्यंत घरे काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या परिसरात सन 1980 पासून हजारो गोरगरीब, कामगार व बेघर कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या 45 वर्षांपासून येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांचे संपूर्ण जीवन, उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व दैनंदिन उपजीविका या परिसरावर अवलंबून आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो नागरिक अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे.
शासनाने अचानकपणे बेदखल करण्याचा आदेश देणे, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने सदर निर्णयास स्थगिती द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील नगरपालिका हद्दीत येणारे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले होते, तर अनेक व्यावसायिक रस्त्यावर आले होते. व्यवसाय संपुष्टात आल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या विस्थापितांचे पुनर्वसन अद्यापही झालेले नाही, त्यामुळे पाटबंधारे विभागाने सदर निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 6 व 7 मधील प्रवरा कालवा परिसरातील नागरिकांना पाटबंधारे विभागाने घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या परिसरात 1980 पासून वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांवर यामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. या कारवाईला स्थगिती मिळावी आणि विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.





