जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
राज्यात अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या पावडरसदृश पदार्थाच्या तब्बल 50 ते 60 गोण्या बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात पावडरने भरलेल्या गोण्या टाकल्याचे दि. 26 जून रोजी परिसरातील एका शेतकर्याच्या निदर्शनास आले. संबंधित शेतकर्याने तातडीने दिघोळचे सरपंच दशरथ राजगुरू यांना याची माहिती दिली. त्यानंतर सरपंच राजगुरू यांनी सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. गोण्यांचा एवढा मोठा साठा रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी येथे आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत सरपंच दशरथ राजगुरू यांनी तात्काळ खर्डा पोलीस स्टेशन व वन विभागाच्या अधिकार्यांना माहिती दिली. त्यानंतर खर्डा पोलीस आणि वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या संपूर्ण प्रकरणाची वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी तातडीने सखोल चौकशी करून संबंधित पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, तसेच हा साठा येथे टाकणार्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या या सर्व गोण्या घटनास्थळीच पडून असून, त्यामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि जनावरांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने या साठ्याची योग्य विल्हेवाट लावून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात छापे टाकून अनेक भेसळखोरांच्या मुसक्या आवळया व कडक कारवाई केली आहे त्याचा धसका घेऊन जामखेड तालुक्यातील काही भेसळखोरांनी हि पावडर टाकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.




