नाशिक | प्रतिनिधी
जिंदाल कंपनीत सोमवारच्या दिवशी (दि. ८) कामगारांवरील लाठीचार्जची घटना ताजी असतानाच अचानक कंपनीकडून रात्री २५ कामगारांना कंपनीने कामावरून काढून टाकल्याची घटना घडली. यानंतर संतप्त झालेल्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले असून जवळपास २ हजार कामगार या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. एचआर विभागाच्या पाच अधिकाऱ्यांना कंपनीने कामावरून काढावे त्यानंतरच काम सुरु करणार असल्याचा पावित्रा या कामगारांनी घेतल्याने सध्या कंपनीत तणावपूर्ण वातावरण आहे.
घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त दिला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी अतिरिक्त कुमक बोलवून घेतली आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीत नामांकीत कंपनी ज़िन्दाल पॉलीफिल्म्सची कंपनी आहे. या कंपनीत महाराष्ट्र राज्याबाहेरील जवळपास तीन हजारापेक्षा अधिक कामगार काम करतात.
गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीत कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात काही कारणावरून वाद होत होते. सततच्या वादामुळे या आठवड्यात सोमवारी कंपनीत पोलिसांची कुमक दाखल झाल्यानतर काही कामगारांवर याठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला होता. यावेळी कंपनीकडून कामगार नियम पाळत नसल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, अचानक काल रात्री २५ कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच यातील काही कामगारांना थेट रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर कंपनीतील कामगारांनी या रात्रीच्या वेळी हे कामगार कुठे जातील काय करतील यामुळे पुन्हा कंपनीत घेऊन आले.
कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने कामावरून काढून टाकण्याचा प्रकार घडला. यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. सर्वच कामगार राज्याच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे या कंपनीत कुणाचीही युनियन नाही, कामगार संघटना नाही. त्यामुळे आता कामगारांनीच एकत्र येत कंपनीकडून देण्यात आलेल्या वागणुकीवर रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची विचारणा करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही.




