कोलकाता । Kolkata
पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराची मालिका थांबताना दिसत नाहीये. निवडणुकीनंतरच्या हिंसक घटनांनी संपूर्ण राज्याला हादरवून सोडले असतानाच, आता थेट लोकप्रतिनिधींना लक्ष केले जात आहे.
परगणा जिल्ह्यातील सोनारपूर भागात निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर विरोधकांकडून अत्यंत लाजिरवाणा आणि हिंसक हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण बॅनर्जी सोनारपूर येथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या आंदोलकांनी त्यांना अचानक वेढा घातला.
यादरम्यान त्यांच्यावर जोरदार अंडीफेक करण्यात आली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, संतप्त जमावाने खासदारांना थेट धक्काबुक्की करायला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांचे कपडेही फाटले. त्यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर डोक्यावर घेण्यात आला होता. खळबळजनक बाब म्हणजे, हा बंगालमधील २४ तासांतील दुसरा मोठा राजकीय हल्ला आहे.
अवघ्या एक दिवसापूर्वीच टीएमसीचे आणखी एक दिग्गज खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही असाच हल्ला झाला होता. एकापाठोपाठ एक झालेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे संपूर्ण पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा तृणमूल काँग्रेसकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.




