Thursday, May 2, 2024
Homeनगरकोकमठाण, रेलवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

कोकमठाण, रेलवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी आदी परिसरास सोमवारी रात्री झालेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. हाती आलेली खरिपाची सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, कांदा रोपे आदीसह ऊस पीक, फळबागा मातीमोल झाल्या आहेत. शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात अजूनही साठून आहे, त्यामुळे खरिपाची पिके सडून गेली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी केली आहे.

- Advertisement -

ते म्हणाले, चालू हंगामात सुरूवातीला पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. पण परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या परिसरात दुबार पेरणीचे संकट सहन करूनही शेतकर्‍यांनी खरिपाची पिके घेतली. सोमवारी रात्री हस्त नक्षत्राचा प्रचंड पाऊस झाला आणि निसर्गाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. शेतात साठलेले पाणी कसे काढायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोकमठाणसह आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपून काढले.

यात शेतकर्‍यांनी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले छत कोलमडून पडले आहे. काही ठिकाणी रिकाम्या कांदा चाळींचे नुकसान झाले आहे. जनावरांसाठी केलेली चारा पिके व खरिपाची पिके पूर्णपणे सडली आहेत. त्याची काढणी आता होणार नाही. खरिपाच्या भरवशावर आगामी रब्बीचे नियोजन शेतकर्‍यांनी केले होते. पण त्यावरही निसर्गाने वरवंटा फिरविला आहे. अगोदरच समृध्दी महामार्ग या भागातून गेला आहे. शेतकर्‍यांनी जीवापाड जपलेल्या जमिनी यासाठी संपादित झाल्या. त्यातून मिळालेल्या पैशावर अन्य शेतीपिके केली. पण तीही पावसाच्या पाण्यात नष्ट झाली आहेत.

शेतकरी राजाने जगावे कसे? असा प्रश्न पडला आहे. शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई द्यावी व रब्बी हंगामासाठी भरीव मदत करावी, अशी मागणी सभापती संभाजी रक्ताटे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या