कोल्हापुर । Kolhapur
कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात शुक्रवारी (22 ऑगस्ट) रात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. साऊंड सिस्टीमच्या वापरावरून सुरू झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतले, ज्यामुळे परिसरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. यात काही जण जखमी झाले असून, पोलिसांनी 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धार्थनगर येथे भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापनदिन साजरा करण्यात येत होता. या सोहळ्यासाठी दुपारी स्वागत कमानीजवळ साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. मात्र, यामुळे मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याने स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सिस्टीम बंद केल्यानंतर रात्री 9:30 च्या सुमारास मोठा जमाव पुन्हा परिसरात जमला. ढोल-ताशांच्या गजरात वर्धापनदिन साजरा करण्यास सुरुवात झाली, पण अचानक काही तरुणांनी वाहनांची तोडफोड सुरू केली. काही वाहने उलटवून पेटवण्यात आली, ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
या गोंधळात एका गटाने परिसरातील निळा ध्वज फाडल्याने दुसरा गट संतप्त झाला. दोन्ही गट आमने-सामने आले आणि दगडफेक सुरू झाली. काहींनी पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याचा आरोपही समोर आला आहे. या घटनेत अनेक वाहने, विशेषत: दहाहून अधिक दुचाकी आणि काही चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. काही वाहने जाळण्यात आली. या दंगलीत काही महिला सहभागी असल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अतिरिक्त पोलिस फौज बोलावण्यात आली. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे काही तासांत परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी शांततेचे आवाहन केले आहे.
“हा वाद गैरसमजातून निर्माण झाला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दगडफेक आणि तोडफोडीत सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला असून, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली आहे.




