रांजणगाव देशमुख (वार्ताहर)
कोपरगाव-संगमनेर महामार्गावर शहापूर शिवारात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
संगमनेरच्या दिशेने जात असलेल्या ट्रक (क्रमांक एच.आर.७४ बी ६२१८) ने मोटरसायकल (क्रमांक एम.एच. १५ इ.वाय. ८०९८) ला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील सर्जेराव शांताराम सोनवणे (वय ४०) आणि त्यांची पत्नी रुपाली सर्जेराव सोनवणे (वय ३५), रा. वेल्हाळे, ता. संगमनेर हे दोघे जागेवरच ठार झाले.
अपघात एवढा भीषण होता की सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले, तर रुपाली सोनवणे यांच्यावरूनही ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी तातडीने शिर्डी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले.
या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असून अनेकांनी जीव गमावला आहे. तरी संबंधित विभाग या रस्त्याचे काम कधी करणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने या मार्गाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.