श्रीरामपुरात जोरदार घोषणाबाजी; सुमारे तीन हजार महिलांचा सहभाग
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी श्रीरामपुरात संविधान बचाव समितीच्यावतीने महिलांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला सर्वधर्मिय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सीएए, एनआरसी या केंद्र सरकारच्या विधेयकांना देशभरातून विरोध होत आहे. श्रीरामपुरातही याच्या विरोधात मोर्चा, धरणे आदी आंदोलने करण्यात आले. संविधान बचाव समितीच्यावतीने सर्वधर्मिय महिलांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना आझाद चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी महिला चळवळीतील नेत्या डॉ. निशाताई शिवूरकर म्हणाल्या, केंद्र सरकार नागरिकत्व विधेयकाच्या रुपाने घटनाबाह्य काम करीत आहे. या कायद्यामुळे गरीब, अल्पसंख्य, भटके यांची तसेच विशेष करून महिलांची प्रचंड पिळवणूक व हेळसांड होणार आहे. देशातील मुलभूत प्रश्नांवरून जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी केंद्र सरकार असे नको ते उद्योग करत आहे. एन.पी.आर. ही एन.आर.सी.ची पहिली पायरी असल्यामुळे त्यालाही विरोध करून त्याच्यावरही बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.
कॉ. मदिना शेख यांनी धर्माचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आमचे नागरिकत्व घटनादत्त असल्यामुळे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रमादेवी धीवर, बानोबी शेख, डॉ. सुजाता चौदंते, डॉ. तंजिला शेख, डॉ. कवसर सलीम, सलमा शेख, बुशरा शेख यांची भाषणे झाली.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी अहमद जहागीरदार, मुजफ्फर शेख, कॉ. जीवन सुरुडे, नागेश सावंत, अंजूम शेख, साजीद मिर्झा, अशोक दिवे, मुक्तार शहा, नईम शेख, अजीज बारुदवाले, शरीफ शेख, अशोक बागुल, अक्तर शेख, डॉ. सलीम शेख, सलीम जहागीरदार, नाजीम शेख, तौफिक शेख, मेहबूब कुरेशी, जावेद तांबोळी, नदीम तांबोळी, अमरप्रीत सिंग, लकी सेठी, के. सी. शेळके, फिरोज शेख, जोएफ जमादार, मल्लू शिंदे यांच्यासह संविधान बचाव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अहमद जहागीरदार यांनी तर सूत्रसंचालन मुजफ्फर शेख यांनी केले.