Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डी येथून रेल्वेने 1402 वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशकडे रवाना

शिर्डी येथून रेल्वेने 1402 वीटभट्टी कामगार उत्तर प्रदेशकडे रवाना

शिर्डी (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या राहाता आणि शिर्डी परिसरात नऊ विट भट्टयांवर काम करणार्‍या उत्तर प्रदेश राज्यातील 1402 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना काल दुपारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यामध्ये साकुरी येथील 437, राहाता येथील 218, पिंपळस येथील 98, पुणतांबा येथील 55, खडकेवाके येथील 29, वाळकी येथील 35, रुई येथील 67 आणि एकरुखे येथील 89 कामगारांचा समावेश आहे. जवळपास सत्तावीस तासांच्या प्रवासानंतर ही रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. राज्याच्या विविध भागात अन्य राज्यांतून आलेले कामगार, नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया पार पाडून त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते.

- Advertisement -

यासंबंधिची विहित प्रक्रिया साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद, साई संस्थान प्रसादालयाचे मुख्य व्यवस्थापक विष्णू थोरात तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने पार पाडून संबंधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली.

पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना, अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता. शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1251 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे. काल 1402 कामगार व त्यांच्या कुटुंबीय उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रेल्वेने मार्गस्थ झाले.

सर्व प्रवाशांना यावेळी प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्यावतीने मास्क पुरविण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने संबंधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या