डांगसौंदाणे : कांदा चाळीत बसलेल्या शेतकऱ्यास सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर सदर शेतकऱ्याचा मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.
मधुकर विठल खैरनार (५९) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास कांदा चाळीत बसलेले असतांना विषारी सापाने त्यांच्या दंडाला दंश केला. ही बाब खैरनार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घरच्याना सांगत तात्काळ डांगसौदाने ग्रामीण रुग्णालय गाठले मात्र सदर हे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने कोव्हिड सेंटर म्हणून ताब्यात घेतल्याने येथील इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
खैरनार यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचे सांगण्यात आल्याने २० किलोमीटर वरील कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे उपचाराला विलंब झाल्याने त्यांची प्राणजोत मालवली.
या घटनेमुळे डांगसौंदाने परिसरातील असंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला असून रुग्णालय असून नसल्यासारखे झाल्यामुळे शेतकऱ्यावर मृत्यू ओढवला आहे, असा सतंप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.