मुंबई | Mumbai
सोमवारपासून जोर धरलेल्या पावसाने बुधवारपासून मुसळधार रुप धारण केले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज ही हवामान खात्याने रायगड, पालघर, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईला अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
मुंबईला सोमवार पासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईची दैना झाली आहे. असे असतानाच हवामान विभागाकडून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुढील ७२ तासांत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्लाझ्मा चोरी, भेसळ आणि विक्रीचे धागेदोरे नाशकात! गुजरातमधील टोळीचा पिपासू धंदा
जिल्हा घाटमाथ्यांना अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डोंगराळ भागांमध्ये दरड कोसळणे, रस्ते वाहतुकीवर परिणाम होणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने आज विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्यामुळे आज विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाण्यात पावसाची संततधात
हवामान विभागाकडून ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. पण त्याचा निचरा लवकर झाल्याने दैनंदिन कामांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.




