नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिबा देत इतिहासात प्रथमच सोमवती अमावस्येच्या निमित्ताने संपन्न होणारा वैद्य कुटुंबीयांच्या पंचमुखी कपालेश्वर पालखी सोहळा रद्द करण्यात येऊन मंदिरात फक्त पूजा विधी संपन्न झाला.
यामध्ये कपालेश्वर मंदिर परिसरात पंचमुखीला प्रदक्षिणा घालून पूजेची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करत कुठल्याच प्रकारे लोकांची गर्दी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली गेली. सोमवारी दुपारी नेहमीच्या प्रथेप्रमाणे पंचमुखी महादेव कपालेश्वर मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पूजा विधी संपन्न झाला. यावेळी कुठलीही पालखी काढण्यात आलेली नाही.
गेल्या १२६ वर्षापासून अखंड परंपरा लाभलेला हा पालखी सोहळा आहे. यामध्ये सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. परंपरेनुसार चांदीच्या पंचमुखी महादेव मुखवट्यांची पालखी काढली जाते.




