त्र्यंबकेश्वर : नगरपालिका कंत्राटी सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी स्वतःला अर्धे गाडून घेत आंदोलन सुरू असून यात पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे.
दरम्यान त्रिंबक नगर परिषदेने लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी दुर करण्यासाठी सुरू केलेल्या कॉस्टकटींगचा फटका ठेकेदारीतील सफाई कामगारांना बसला आहे. करोना संसर्गाची जोखीम अंगावर घेऊन सफाईचे काम करणा-या ‘ करोना योद्धा ‘ सफाई कामगारांना ५० टक्के कमी मेहनताना देणार असल्याचे पालिकेने ठरवल्याने मंगळवारी सफाई कामगार कामावर आले नाही.
तत्पूर्वी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी प्रविण निकम ,व नगरसेवक यांनी बैठक घेऊन कंत्राटी सफाई कामगारांना प्रत्येकाला महिन्यातून १० दिवस काम देण्यात येईल. कामगारांना यापुर्वी साधरणत: ९ हजारांच्या दरम्यान पगार मिळत होता. यापुढे पाच हजारात काम करावे लागेल असे तोंडी सांगून एवढया पगारात काम करायचे असेल तर करा अन्यथा कामावर येऊ नका असे ही पद्याधिकारी यांनी कामगारांना सुनावले आहे. अर्थात कामगारांनी या प्रस्तावास नकार देत मंगळवारी कामावर न जाता घरात बसणे पसंत केले आहे.
सध्या लॉक डाउन च्या काळात पालिकेने उत्पनाचे स्त्रोत थांबल्याने खर्चात कपात करण्याचे धोरण आखले आहे. वीज बिल बचत करणे, पाणी पुरवठा खर्च कमी करणे असे निर्णय घेतांनाच सफाई करिता खर्च कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरासाठी स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. महिन्याला साधरणत: सतरा लाख रूपये व्हि.डी.के.या एजन्सीला द्यावे लागतात.
यामध्ये घंटागाडीने घरोघर कचरा संकलीत करणे, कचरा व्यवस्थापन करणे आणि रस्ते व गटारी सफाई अंतर्भुत आहे. ठेकेदाराकडे ५५ कामगार आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाने ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सफाई कामगारांनी स्वतःला अर्धे गाडून घेत अनोखे आंदोलन केले.
यापूर्वी प्रहार प्रणित जनशक्ती सफाई कामगार संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. ‘सरकारने आमच्या मागण्या मान्य मागण्या केल्या नाहीतर (दि.८) रोजी आंदोलन करून स्वतःला गाडून घेऊ अशी धमकी कर्मचारी नाना दोंदे यांनी दिली होती. त्यानुसार या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःला अर्धे गाडत आंदोलन सुरू केले आहे.
सफाई कामगारांच्या पगारातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधी आणि अन्य फंड कपात करण्यात येत असते मात्र अनेक वर्षांपासून एकाही ठेकेदार कंपनीने त्यांचा भविष्य निर्वाह निधी दिलेला नाही. नगर पालिका प्रशासनाने देखील याबाबत खबरदारी न घेतल्याने सर्व सफाई कामगार आज हालाखीचे जीवन जगत आहेत. महिन्याला ठेकेदार एजन्सीला १७ लाख रुपये नगरपालिका देत असताना ५५ सफाई कामगाराना पुरते सहा लाख देखील हातावर पडत नव्हते. प्रत्येक कामगाराला अवघे ८ ते ९ हजार मिळत असल्याने आज त्यांच्याकडे शिल्लक काही नाही.
त्रिंबक नगर पालिकेने सफाई तसेच वीज आणि पाणी पुरवठा या सेवा ठेकेदारीत पुरवितांना मोठया प्रमाणात पैसा खर्च केला आहे.दोन दिवसांच्या यात्रेत निर्मलवारीवर पाऊण कोटी खर्च करतात.सातत्याने उधळपटटी करत असल्याने अवघ्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे पालिका डबघाईला येवून शहर स्वच्छता थांबविण्याची वेळ आली आहे.
कायमस्वरुपी व कंत्राटी कामगारात वादाची थिनगी
त्रिंबक नगर परिषदेने शहरातील स्वच्छतेसाठी कंत्राट दिले असून महिन्याला १७ लाख रुपये स्वच्छतेवर खर्च केले जात आहे यामुळे नगर परिषदेने आपले कायमस्वरूपी सफाई कामगार इतर विभागात वळविले आहे. परंतु कंत्राटी कामगार कामावर न आल्याने नगरपरिषदेने या कायमस्वरूपी सफाई कामगारांना पुन्हा सफाईचे काम दिली असून यामुळे कंत्राटी व कायमस्वरूपी कर्मचारी यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे ‘ तुम्ही संपावर गेल्यामुळे आम्हाला तुमचे काम करावे लागणार आहे ‘ असा दोष कायमस्वरुपी कामगार कंत्राटी कामगारावर करीत असल्याची चर्चा आहे. तर कंत्राटी कामगारांचा काहीही दोष नसतांना थेट त्यांची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे याची जाणीव कोणालाही नाही असे यावरून दिसून येत आहे.
करोना या महामारीत नागरिक घरात सुरक्षितरित्या असतांना कंत्राटी कामगार मात्र शहराच्या स्वच्छेतेसाठी आपला व कुंटुंबाचा जीव धोक्यात घालून स्वच्छता करीत होते.त्यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व गावातील नागरिकांनी कंत्राटी कामगारांवर फुलांचा वर्षाव करुन औक्षण केले. आता त्याच कामगारांना घराचा रस्ता दाखविण्याची भाषा होत आहे. हा कुठला न्याय असा प्रश्न कंत्राटी कामगारांनी उपस्थित केला आहे.




