Friday, May 3, 2024
Homeनगरनगरमध्ये शिवभोजनाच्या थाळ्या होणार दुप्पट !

नगरमध्ये शिवभोजनाच्या थाळ्या होणार दुप्पट !

पाच केंद्रेही वाढणार : एक हजार 400 थाळ्यांचे टार्गेट

अहमदनगर (प्रतिनिधी)– राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर शहरातील सात केंद्रांवर सध्या 10 रुपयांत मिळणार्‍या शिवभोजनाच्या 700 थाळ्या सुरू आहेत. मात्र, मागणी आणि गरज पाहता हे प्रमाण दुप्पट करण्यात येणार आहे. यामुळे नगर शहरात लवकरच एक हजार 400 थाळ्या शिवभोजन थाळ्या मिळणार आहेत. यासाठी 5 ठिकाणी नवीन केंद्रे तर जुन्या तीन केंद्रांमध्ये वाढीव 200 थाळ्या शिवभोजन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या आदेशानुसार नगर शहरातील सात केंंद्रावर सध्या दररोज 700 थाळ्या शिवभोजन सुरू आहे. या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून भोजनाचा दर्जा चांगला आहे. यामुळे शहरात शिवभोजनाला मागणी वाढत आहे. सर्वच ठिकाणी वाढीव थाळ्यांची मागणी नसली तरी काही गर्दीच्या ठिकाणी आणि कष्टकर्‍यांची संख्या अधिक असणार्‍या ठिकाणी शिवभोजन लवकर संपत आहे. यामुळे अशा ठिकाणी थाळ्यांची संख्या वाढविण्याचे राज्य सरकारकडून सुचविण्यात आले आहे.

त्यादृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाने कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने सुरू होणार्‍या केंद्रासाठी अर्ज आलेल्या ठिकाणाची पाहणी सोबतच जुन्या ठिकाणी दररोजच्या भोजनाचा दर्जा यावर पुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे. मात्र, नगर शहरातील सर्वच ठिकाणी शिवभोजनाचा दर्जा उत्तम असून सर्वच केंंद्रांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यामुळे जुन्या केंंद्रातील माळीवाडा भागातील कष्टाची भाकर केंद्रात आणखी 100 तर जिल्हा रुग्णालजवळील कृष्णा भोजनालय व सूवर्णम संचालित अन्नछत्र या ठिकाणी प्रत्येकी 50 या प्रमाणे 100 थाळ्या वाढविण्यात येणार आहेत. यासह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नगर तहसीलदार कार्यालया परिसारात, माळीवाडा एसटी बसस्थानक एमआयडीसीतील वखार महामंडळाजवळ आणि स्वास्तिक चौक एसटी बस स्थानक या ठिकाणी प्रत्येकी 100 थाळ्यांचे नव्याने केंद्र प्रस्तावित आहेत.

रोजचा खर्चही होणार दुप्पट
नगर शहरात सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांवर सध्या दररोज 28 हजार रुपयांचा खर्च सुरू आहे. आता राज्य सरकारने थाळ्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे हा खर्च देखील दुप्पट म्हणजे दररोजचा 56 हजार रुपये खर्च होणार आहे.

दोन महिन्यांनी तालुक्याच्या ठिकाणी
राज्य सरकारने शिवभोजन योजना कार्यानिव्त करतेवेळीच आधी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्यानंतर तीन महिन्यांनी तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार साधारणपणे दोन महिन्यांनी तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन मिळणार असल्याचा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या