प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर व तालुक्यात परराज्यातून इतर जिल्ह्यातून येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे तालुक्यासाठी शहरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने अधिक कठोरात कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे. अशी मागणी जनतेमधून होत आहे.
मागील आठवड्यापासून शहर व तालुक्यात परराज्यातून तसेच जिल्हा बाहेरून येणार्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण नाही. परंतु शहर व तालुक्यात बाहेरून येणार्यांचा ओघ काही थांबत नाही.
काल पुन्हा पंजाबमधून श्रीरामपुरात तिघे जण आले तर तालुक्यातील गोंडेगाव येथे गुजरातमधून चौघेजण आले आहेत. पंजाबहून आलेल्या तिघांना नगर येथे तपासणीसाठी पाठविल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी दिली.
रेडझोन असणार्या बाहेरच्या ठिकाणाहून येणार्यांपासून श्रीरामपूर शहर व तालुक्याला संभाव्य धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आणि तालुक्याच्या हद्दीवर कडेकोट तपासणी व सुरक्षा असणे अत्यावश्यक झाले आहे.
याबाबत प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी यापूर्वीच बाहेरून येणार्यांची नावे कळवण्याचे आवाहन केलेले आहे. त्याप्रमाणे लोक फोनही करत आहेत. मात्र गुपचूप रात्री-अपरात्री येण्याचे प्रकारही अजून थांबलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अजूनही कठोरात कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.




