पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
पंचवटीतील रामतीर्थ परिसरातील गांधी तलावात बुडणाऱ्या लहान मुलाला जीव रक्षक दलाने प्रसंगावधान राखत वाचवले. बचावलेल्या मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांनी जीव रक्षक दलाचे आभार मानले.
श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील रामतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात भक्त आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शनिवार (ता. २६) रोजी नाशिक शहरासह गंगापूर धरण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी वाढत आहे.
रविवार (ता. २७) आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून आलेले जोगिंदर किरण एम हे कुटुंब रामतीर्थावर दर्शनासाठी आले होते. त्याचवेळी त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा गांधी तलावातील मोरीजवळ पाण्यात पडला. तो बुडू लागल्याचे लक्षात येताच देवमामलेदार कार्यालयाजवळ उपस्थित असलेल्या जीव रक्षक दलाच्या सदस्यांनी तत्काळ पाण्यात उड्या मारून त्याला सुखरूप बाहेर काढले.
ही कामगिरी सुरज मश्रम, शंकर माळी, सुरक्षा रक्षक किसन इंफाळ, सचिन राऊत, नामदेव बेनके, महिला रक्षक शीतल पगारे, सुनीता पगारे, नंदा महाले आणि उषा कातकाडे यांनी कौशल्याने पार पाडली.
दरम्यान, रविवारीच दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईहून आलेला एक भाविक रामतीर्थावरील दुतोंड्या मारुती मंदिराजवळ पाण्यात बुडाला होता.स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीव रक्षक दलाने त्यालाही सुरक्षित बाहेर काढले.
सध्या नाशिक शहर आणि गंगापूर धरण परिसरात श्रावण सरी सुरु आहेत. धरणातून सतत विसर्ग सुरू असल्याने गोदा घाटावरील पाण्याची पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचे फायरमन संजय कानडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,”गोदाघाट परिसरात दर्शनासाठी किंवा पाहणीसाठी येणाऱ्या भाविकांनी अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरू नये. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे.”





