अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून एका युवकासह त्याच्या पत्नीवर हल्ला करून मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथे घडली. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी रोहित सुभाष गाडे (वय 22, रा. वाळकी) यांच्या जबाबावरून सोमवारी (3 ऑगस्ट) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानुसार बंटी अनिल आरवडे, पोपट अशोक गायकवाड, राजु प्रकाश आरवडे, संदेश पेत्रस आरवडे, सुरेखा पेत्रस आरवडे, हरण ऊर्फ बाळी शिवाजी पवार (सर्व रा. वाळकी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित गाडे यांच्या माहितीनुसार, त्यांच्या भावाने एका मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. त्यातून फिर्यादीच्या मोठ्या भावाकडे तुम्ही का गेला होता, अशी विचारणा फिर्यादीने संशयित आरोपींकडे केली. त्यावेळी संशयित आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच तुझ्या विरोधात केस दाखल करतो, मग तुला दाखवतो, अशी धमकी दिली. त्यानंतर 29 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या आजारी पत्नीला दुचाकीवरून वाळकी येथील दवाखान्यात घेऊन जात असताना हरिजन वस्ती परिसरातील चर्चजवळ संशयित आरोपींनी त्यांना अडवले. संशयितांनी हातातील काठ्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला मारहाण केली.
या हल्ल्यात दोघे जखमी झाले. मारहाणीनंतर संशयित आरोपींनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
जखमींवर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णालयातील जबाबाच्या आधारे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार किशोर लाड अधिक तपास करीत आहेत.




