अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका व हरियाली संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 22 एप्रिल या सात दिवसाच्या कालावधीत वसुंधरा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन, कापडी पिशव्यांचे वाटप, निबंध व चित्रकला स्पर्धा, वसुंधरा शपथ, जनजागृती पर विद्यार्थ्यांची रॅली, व्याख्यान, महास्वच्छता अभियान आदी कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यास शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
सावेडी परिसरातील यशोदा नगर परिसरात भरत असलेल्या भाजी बाजारातील भाजी विक्रेते तसेच ग्राहक नागरिक यांच्याशी संवाद करीत व्यापक जनजागृती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री चंद्रकांत शिंदे यांनी नागरिकांना संबोधन करताना सांगितले की हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि वसुंधरेला आरोग्यदायी ठेवण्याकरता वैयक्तिक आणि सामुदायिक कृतीवर भर द्यावा लागेल. या करिता दिनचर्येतून पर्यावरण संवर्धन म्हणजेच नागरिकांनी दररोजच्या छोट्या छोट्या कृतीद्वारे वसुंधरेचे रक्षण करणे आवश्यक आहे असे शिंदे यांनी सांगितले.
या सप्ताहमध्ये झालेले विविध कार्यक्रम, उपक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, घनकचरा विभाग प्रमुख परीक्षीत बिडकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, प्रशांत रामदिन, आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, रवींद्र अष्टेकर, महर्षी चितांबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंदा शिंदे, महात्मा फुले विद्यालय प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया कुंदाडे, मनीषा बारगळ, निलोफर पठाण, संगीता अकोलकर, अमृता शिंदे, शितल गवळी उपस्थित होते.





