मुंबई | Mumbai
रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री आणि शिंदेसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी अखेर महाड शहर पोलीस ठाण्यात शरण आले आहे. भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. २ डिसेंबरपासून तो फरार होता. अखेर दीड महिन्यांनंतर तो महाड पोलिसांसमोर शरण आला आहे. या प्रकरणी मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला खडसावल्यानंतर विकास गोगावले पोलिसांसमोर शरण आले.
मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर एक महिन्याच्या कालावधीनंतर महाड पोलिसांना शरण आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाड पोलीस ठाण्याबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवसेनेचे विकास गोगावले महाड पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे. सध्या पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विकास गोगावले यांना थोड्याच वेळात पोलीस कोर्टात हजर केले जाईल.
नेमकं प्रकरण काय होतं?
गेल्या महिन्यात, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले होते. महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.
या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास गोगावले फरार होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना पोलिसांत हजर होऊन जामीन मिळवणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
या दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावलेसह महेश गोगावले, विजय मालुसरे, धनंजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ हे ८ जण पोलिसांसमोर शरण आले. त्यामुळे महाड पोलिस ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विकास गोगावलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
मुंबई हायकोर्टात या सुनावणीवेळ कोर्टाने राज्य सरकारसह पोलिसांनाच खडेबोल सुनावले होते. ‘मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात. मंत्र्यांच्या संपर्कात असतात. पण पोलिसांना ते सापडत नाहीत. हे सगळं होऊनही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात. सरकारने मनात आणले तर कोणत्याही व्यक्तीला २४ तासांत अटक केली जाऊ शकते.’ , असे कोर्टाने म्हंटले होते. विकास गोगावले यांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच विकास गोगावले महाड पोलिसांना शरण गेले.





