मुंबई । Mumbai
राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदात फेरबदल करून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याआधी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते.
सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. तर संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विकासकामांना वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार हा बदल प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यामागे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सावकारे यांची उचलबांगडी का करण्यात आली, यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. भंडाऱ्यातील स्थानिक जनतेतून व काही जनप्रतिनिधींनी सावकारे यांच्यावर अनेकदा टीका केली होती. ते पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून उपलब्ध राहत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असतानाही त्यांनी उपस्थिती दाखवली नव्हती, असे आरोप करण्यात आले.
भंडाऱ्याला जवळच्या जिल्ह्यातील पालकमंत्री द्यावा, अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत होती. या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला असल्याचे मानले जात आहे. पंकज भोयर हे विदर्भातीलच असून स्थानिक प्रश्नांवर ते अधिक सक्रिय राहतील, अशी अपेक्षा आहे. या निर्णयामागे आगामी नगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचारही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क व संवाद वाढावा यासाठी सरकारने ही बदल नियुक्ती केली असावी, असा कयास वर्तविला जात आहे.
भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदातील हा बदल केवळ प्रशासकीय आहे की त्यामागे राजकीय गणिते दडलेली आहेत, याबाबत स्पष्टता नाही. मात्र पंकज भोयर यांच्या नियुक्तीमुळे स्थानिकांमध्ये नवीन अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. विकासकामांना गती मिळावी आणि प्रशासनाशी अधिक प्रभावी संवाद घडावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





