नाशिक | Nashik
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Minister Pankaja Munde) यांनी आज (दि.०२) रोजी श्रावण मासाच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे भगवान त्र्यंबकराजाचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या की, “आगामी काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे सिंहस्थ भरणार आहे. याठिकाणी कुंभमेळा काळात खूप लोक येतील. त्यामुळे स्वच्छतेसाठी शाश्वत उपाययोजना केल्या पाहिजेत. साधू-महंत जिथे डुबकी मारतील, ते पाणी स्वच्छ असले पाहिजे. २०१४ मध्ये मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी देखील कुंभमेळा भरला होता. आता पुन्हा मंत्री झाले आणि पुन्हा कुंभमेळा भरत आहे”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या की, “सध्या मी पर्यावरणमंत्री (Environment Minister) आहे. अनेक ठिकाणी प्रदूषणकारी उद्योग उभे राहत आहेत. कचऱ्याची देखील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वातावरणीय बदलाचे संकटही समोर असून हे खाते माझ्याकडेच आहे. पण या खात्याला स्वतंत्र निधी नाही. त्यामुळे शासनाने आम्हाला थोडी मदत कंरावी. उद्योगांना बळ देऊन पर्यावरण रक्षणाचे काम करायचे आहे. मात्र, नियम आणि कायद्यांचे पालन झाले पाहिजे”, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
तसेच “सीएसआर फंडातून (CSR Fund) जसे मंदिर, शिक्षणासाठी पैसे उभे करतात, तसे तुम्ही पर्यावरणासाठीही निधी उभा करावा, उद्योग विभागाच्या चुकीनंतर जेव्हा दंड पडतो तेव्हा आम्हाला पैसा मिळतो. आम्ही सीईटीपी प्लांट उभारण्यासाठी तयार आहोत, पण त्यासाठी शासनाची (Government) मदत हवी आहे. माझ्या खात्याकडे स्वतःचे बजेट नाही, माझं काम पोलिसासारखं (Police) फक्त शिट्टी वाजवायचं आहे”, असे म्हणत मुंडे यांनी खंत देखील व्यक्त केली.
साधनापीठाचे केले भूमीपूजन
पंकजा मुंडे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात त्र्यंबकेश्वर येथे गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक श्रेत्रात काम करणारे, सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराजांच्या स्वसंवेद्या साधनापीठाचे भूमीपूजन केले.




