
मुंबई | Mumbai
राज्यात हिंदीकरण सक्तिविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येत ५ जुलै रोजी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाची अगदी जय्यत तयारी सर्वच पातळीवर सुरू असून मनसे आणि शिवसेना नेत्यांकडून जोरदारपणे मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. एककीकडे दोन्ही पक्षांकडून मोर्चासाठी जोरदार तयारी सुरु असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यामुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी फडणवीसांना मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी असे म्हटले आहे.
पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांची सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णायाविरोधात राज्यातील अनेक पक्ष एकत्र आली आहेत. मात्र, याबाबत सरकारने अजूनही कोणाताही निर्णय घेतला नाही. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाने याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हिंदीवरून महायुतीमध्येच दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे पाच जुलैच्या मोर्चाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसे चित्रपटसेनेकडून आवाहन
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मराठी कलाकारांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. “ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी ५ जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया ५ जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे ही विनंती. कृतज्ञता म्हणून सर्वांनी ५ जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया धन्यवाद”, असे त्यांनी ट्वीट केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




