पुणे | प्रतिनिधी | Pune
पावसामुळे (Rain) झालेल्या शेतीपिकांच्या आणि जमिनीच्या (Land) नुकसानीची भरपाई (Compensation for Damages) दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांचे निसर्ग संकटामुळे होत असलेल्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून, पंचनामे जलदगतीने सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट एसोसिएशन इंडियाच्या कार्यक्रमप्रसंगी भरणे यांनी पत्रकारांशी सवांद साधला.यावेळी शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणींवरही भाष्य करत ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. हे प्रमाण सतत वाढत आहे. हवामान बदलामुळे सरासरी पावसाऐवजी एकाच दिवशी मुसळधार पावसाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे (Famer) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असे भरणे यांनी म्हटले.
तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्य सरकार (State Government) ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करणार का? या प्रश्नावर बोलतांना भरणे म्हणाले की, “ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही ठराविक निकष आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. सरकारकडून या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात असून, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष देत आहेत. राज्यभर पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. मे ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीत शेतीपिके, जमिनीचे नुकसान किंवा इतर हानी असो, सर्वांना सरकारकडून मदत मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
तर साखर उद्योगाबाबत बोलताना भरणे म्हणाले की, “साखर उद्योग हा राज्यातील अत्यंत महत्वाचा उद्योग असून कारखाना मालक, अधिकारी व पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग उद्योगाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक आहे. कारखान्यांमध्ये नव्या प्रयोगांची अंमलबजावणी होत असून याचा थेट फायदा ऊस उत्पादक (Sugarcane Growers) शेतकऱ्यांना होणार आहे,” असे त्यांनी म्हटले.





