मुंबई | Mumbai
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) आज (सोमवार) पासून राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादसह इतर प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्द आहे. जीडीपीमध्ये राज्याची १३ टक्के भागीदारी आहे. २०२४-२५ मध्ये १ लाख ६५ हजार कोटींची एफडीआय केली आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पीक नियोजनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचे धोरण सरकारने आखले आहे, असे राज्यपालांनी सांगितले. त्यानंतर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडत अजितदादांबद्दलच्या आठवणी जागवल्या.
यावेळी ते म्हणाले की, “दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत, हा प्रस्ताव मांडण्याचा प्रस्ताव आपल्यावर केव्हा येईल, असे वाटले नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadanvis) शोकप्रस्ताव मांडला. सभागृहात दादा माझ्या शेजारीच बसलेले असायचे. अर्थसंकल्पात (Budget) कठोर निर्णय घ्यायला दादा मागेपुढे पाहत नव्हते. मित्रशोक हा आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. लाडकी बहीण योजनेनंतर, अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली होती. आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं. आता त्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत”, असेही त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, “अजितदादा आपल्यात नाहीत, याची मोठी खंत आहे. आता या केवळ आठवणी उरल्या आहेत. अजिदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. काही वेदना कधीच कमी होत नाहीत, अशीच ही वेदना आहे. अजितदादांनी विविध राजकीय क्षेत्रांना पादाक्रांत केलं. दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने समजलं. अजितदादांचा आणि माझा जन्म एकाच तारखेचा आहे. मात्र, २०१४ नंतर आमचं भावनिक नातं तयार झालं. अजितदादा खऱ्या अर्थाने माझे दादाचं होते”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच “अजिदादांच्या आकस्मिक निधन हा संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार असते तर बारावा अर्थसंकल्प मांडला असता. अजित दादांशी आमचं केवळ स्ट्रॅटेजिक नातं नव्हतं तर भावनिक नातं होतं. दादांचं काम हे १० ते १५ मिनाटांचं असायचं. कुठलंही काम कागदावर असायचं, काय बोलायचं ते लिहिलेलं असायचं”, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांच्या आठवणींना सभागृहात उजाळा दिला.
अजितदादांच्या पोटात होतं तेच ओठावर यायचं
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अजितदादांच्या स्वभावात पारदर्शकता होती. त्यांच्या पोटात होतं तेच ओठावर यायचे. ते रोखठोक बोलायचे. होऊ शकत असेल ते काम दादा तात्काळ करायचे. वर्षानुवर्षे काम करताना दादांनी एकवचनी असल्याचा लौकिक राखला. मी विरोधी पक्षनेता असताना दादा मुख्यमंत्री असा उल्लेख करायचे. मी विरोधी पक्षनेता आहे याची त्यांना आठवण करुन द्यायला लागायची. दादांना हळदीचं दूध प्यायला आवडायचं. दादांचा वक्तशीरपणा ही त्यांची सर्वोत्तम सवय होती. कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेआधी दादा पोहोचायचे. १२ वाजताच्या कार्यक्रमाला दादा ११.५९ला यायचे. मंत्रालयात दादा कोणत्याही कर्मचाऱ्याआधी पोहोचायचे. दादा उपस्थित नाहीत म्हणून निर्णय झाला नाही, असं झालं नाही”, असंही त्यांनी म्हटले.





