जळगाव | Jalgaon
जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील (Erandol Taluka) वरखेडे शिवारात शेताला लावलेल्या कुंपणातील विजेचा धक्का (Electric Shock) लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरखेडे ता.एरंडोल येथील एका शेतकऱ्याने (Farmer) आपल्या शेतीमधील पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. शेतात मजुरी करणाऱ्या मजुरांना या वीज प्रवाहाची कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांना त्या तारेच्या कुंपणाचा स्पर्श झाला आणि विजेचा जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.
विकास रामलाल पावरा (वय ३५), सुमन विकास पावरा (वय ३०), पवन विकास पावरा, कंवल विकास पावरा आणि एक वृद्ध महिला (नाव समजलेले नाही) यांचा समावेश आहे. तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) ही चिमुरडी सुदैवाने या घटनेतून बचावली आहे. या दुर्घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करतात, मात्र अशा बेकायदेशीर आणि जीवघेण्या उपायांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या घटनेमुळे शेतात अशाप्रकारे वीज प्रवाह सोडणे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Case) दाखल करून कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.




