मुंबई | Mumbai
सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे ( Official Language Conference) आणि हिंदी दिवसाचे औचित्य साधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदीसोबतच भारतातील प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध करणे हे आमचे मुख्य ध्येय असून, देशातील विविध भाषांच्या विकासातील सर्व अडथळे विघ्नहर्ता श्री गणेश दूर करतील,असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ते म्हणाले की,”महाराष्ट्रात १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुरुवात करून देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लाट निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कल्पनेत स्वधर्म आणि स्वभाषेला अग्रस्थान देत मराठी भाषेचा राजकोष तयार केला. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक बहुभाषिक राज्य आहे, असेही शाह म्हणाले.
मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला
महाराष्ट्राच्या भाषिक विविधतेचे कौतुक करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, “महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ज्यांनी स्वराज्यासोबत स्वधर्म आणि स्वभाषेला प्राधान्य दिले. महाराष्ट्रात मराठीसोबतच कोकणी, गुजराती, हिंदी, सिंधी आणि वारली या भाषांचा एकत्र विकास झाला. महाराष्ट्रासारखा बहुभाषिक प्रदेश संपूर्ण देशात नाही. मराठी भाषेचा आदर झालाच पाहिजे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.”
सावरकरांचे भाषाशास्त्रज्ञ म्हणून योगदान
पुढे ते म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान स्वातंत्र्यसेनानी असण्यासोबतच प्रकांड भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी मोठे काम केले आणि अनेक नवीन शब्दांची निर्मिती केली. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करत राजभाषेने हिंदीत ‘शब्द सिंधू’ तयार केला आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
मातृभाषेतून शिक्षणावर भर
आपला वैयक्तिक अनुभव सांगताना गृहमंत्री म्हणाले, “मी गुजरातचा आहे, तिथे हिंदी बोलली जात नाही. मात्र, हिंदी भाषेच्या ज्ञानामुळे मला राष्ट्रीय स्तरावर काम करताना कधीही अडचण आली नाही. विनोबा भावे यांनीही हिंदीच्या माध्यमातूनच भूदान चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली होती, असे त्यांनी म्हटले.
प्रत्येक प्रादेशिक भाषा समृद्ध करणे हेच मुख्य ध्येय
तसेच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देणे अनिवार्य केले आहे. देशातील प्रत्येक प्रादेशिक आणि भारतीय भाषा समृद्ध करणे हेच केंद्र सरकारचे मुख्य ध्येय आहे, असेही अमित शाह म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हिंदी भाषा संसाधने, टंकन व अंशलिपी प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला, तसेच ‘राजभाषा कीर्ती सन्मान’ आणि ‘राजभाषा गौरव पुरस्कार’ विजेत्यांचा गौरव करण्यात आला.




