जालना | Jalna
मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकरसह ९ वाळू माफियांविरोधात जालना प्रशासनाने (Jalna Administration) तडीपारीची कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यासह बीड ,संभाजीनगर ,परभणी या जिल्ह्यातून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर याला जालना, बीड, आणि परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. यात २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे तर २०२३ मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळल्याप्रकरणी ३०७, ३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा दाखल आहे. तसेच २०२३ मध्ये गोदावरी नदीतून १०० ब्रास आणि ५०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे गोंदी पोलिसात (Gondi Police) दाखल आहे.
तसेच तडीपारीची (Deportation) कारवाई झालेल्यांमध्ये, विलास हरिभाऊ खेडकर (जरांगेंचा मेहुणा), अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर यांचा समावेश आहे.
दरम्यान, मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”सरकारने माझं तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचे नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे १०० टक्के देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) षडयंत्र आहे. चुकीचे काम केले तर माझ्या बापावर जरी केस झाली तरी सोडणार नाही, पाहुण्यांचा तर विषय संपला”, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.