जालना | Jalna
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारला आहे. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत (Meeting) समर्थकांना संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी ते म्हणाले की, “मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र का रोखले? तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलं. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीसच जबाबदार आहेत. फडणवीसांनी विधानसभेत एक भाषणावेळी मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहेत, असे आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच येत्या ३० मे पासून आंदोलन करणार असून, या आंदोलनात तीन कोटीहून अधिक मराठे सामील होतील”, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यात मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पण प्रत्यक्षात अधिकारी कुणबी प्रमाणपत्र वितरीत करताना सरकारकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांचे मनं जिंका. आंदोलनाच्या तारखेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या अशी विनंती यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच सातारा संस्थानच्या गॅझेट आधारे कुणबी प्रमाणपत्राचा जीआर का काढला नाही. कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान यांचा जीआर १९९४ च्या धरतीवर काढण्यात यावा. जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही. तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही”, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
माझ्याविरोधात बोलण्यासाठी दोन कोटी रुपये दिले
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटले की, ” एका मंत्र्यांने माझ्या विरोधात बोलण्यासाठी एका एका संघटनेला दोन कोटी दिले अशी मला माहिती कळली. एका संघटनेच्या अध्यक्षांनी मला सांगितलं. मला असं वाटत माझे भाऊबंध आहे. मला तुमच्या विरोधात जायचं नाही. मी काम सोडून देईल, पण तुमच्याशी खोट बोलणार नाही. मराठ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी शांत आहे”, असेही ते म्हणाले.





