नवी दिल्ली | New Delhi
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये (Baramti) विमान अपघातात निधन झाले होते. मात्र, हा विमान अपघात घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला होता. त्यानंतर आज (शनिवारी) रोहित पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लक्ष घालून हा विषय मांडला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, “व्हीएसआर कंपनीच्या (VSR Company) मागे मोठे लोक असून, त्यांच्याकडून कंपनीला वाचवले जात आहे. व्हीएसआर कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घेतला पाहिजे. याप्रकरणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्याला ते सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. आम्ही माहिती मागितली की, आम्हाला भाजपवाले सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. अजितदादांच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक शंका आहेत त्याचे निरसन झाले पाहिजे”, असे रोहित पवारांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले मात्र ते दिले गेले नाही. तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे कि नाही हे माहित नाही. सीआयडीने देखील एकही रिपोर्ट दिलेला नाही. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. पण आमच्या ट्रोलर्सना भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून सहज मिळते” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.





