मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी येथील खेडगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे? आम्ही आमच्या पैशाने खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही”, असे विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रातील (Maharashtra) तमाम वारकरी उत्तर देतील, असे म्हटले होते.
त्यानंतर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी “पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करुन शकत नाही तर किमान अपमान तरी करु नका. पण, मौलाना शरद पवारांच्या (Sharad Pawar) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंना लगावला होता. सुळेंच्या विधानावरून मटणाच्या वादाला चांगलीच फोडणी मिळाली असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चांगलेच घेरले आहे.
राऊत म्हणाले की, “त्यांच्यावर मटण (Mutton) खाण्याचा कोणी आक्षेप घेतला. या लोकांना टीका करण्याशिवाय काय येते का? महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म कोणी नष्ट केलेला आहे का? तसे असेल तर आम्हाला सांगा. कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांना सांगा की, तुम्ही चोरून काय खाता हे मला माहित आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का? फडणवीस काय खाता हे आम्हाला माहित नाही का?” असे त्यांनी म्हटले.
तसेच “कोणाच्या खाण्यापिण्यावर कशाला जात आहात. स्वतः काय खात आहात. मार्केटला मटण चिकन का महाग झाले आहेत? आम्ही खात आहोत म्हणून नाहीत तर जे कालपर्यंत खात नव्हते तेच रांग लावून तिथे उभे राहत आहेत”, असा हल्लाबोलही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी मांसाहाराबाबत बोलतांना म्हटले की, “आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, त्यात कोणाचे काही जाणार नाही. आम्ही कोणाचे गुलाम नाही. मी मटण खातो तर काय पाप केले आहे का? माझ्या पांडुरंगाला ते मान्य आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे?” असे त्या म्हणाल्या.





