मुंबई | Mumbai
राज्य सरकारने (State Government) राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला मनसेप्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वसामान्य जनतेने विरोध केला आहे. त्यातच आज शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारची भूमिका आपणास मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच येत्या ६ जुलै रोजी मनसे (MNS) पक्षातर्फे हिंदी सक्तीविरोधात मोर्चा (Morcha) काढला जाणार असून, या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. त्यानंतर आता राज आणि उद्धव या ठाकरे बंधुंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले असून, त्यांनी ६ जुलै रोजीच्या मोर्चातील सहभागाबाबतही विधान केले आहे. तसेच त्यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवला जाण्याच्या धोरणाचा देखील विरोध केला आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “माझ्यामते प्राथमिक शिक्षणात (Education) हिंदी सक्ती नसायला हवी असा सगळ्यांचा आग्रह आहे. इयत्ता पाचवीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. पण, लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा याचा देखील विचार करावा लागेल. दुसर्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर हे योग्य नाही. म्हणून पाचवी पर्यंतचा हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव आणि राज ठाकरे हे दोन बंधु (Brother) जे बोलतात त्यांचे वाक्य काही चुकीचे नाही. त्यामध्ये, कोणत्या स्तरावर हिंदी हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे, मराठी भाषेवरुन एकत्र येण्यासाठी ते भूमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. तसेच ६ जुलै रोजीच्या मोर्चाबद्दल मला अजून कुणी सांगितलेले नाही. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही इतर राजकीय (Political) पक्षांसोबत बोलणार आहोत. आमचा विचार नकारात्मक नाही”, असेही शरद पवार यांनी सांगितले.




