मुंबई | Mumbai
राज्यात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. तर महायुतीला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. या निवडणुकीत महायुतीने राज्यात २३२ जागांवर विजय मिळविला तर महाविकास आघाडीला तीन पक्ष मिळून केवळ ५० जागांवर विजय मिळाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीचा विजय हा ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप करण्यात आला.
यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर (MLA Uttamrao Jankar) यांनी आपल्याला माळशिरस मतदारसंघातील मारकरवाडी गावातून कमी मताधिक्य मिळाल्याने आपण राजीनामा देणारं असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी याविरोधात राज्यात रान देखील उठविले होते. त्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर हे येत्या २३ जानेवारी रोजी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. यानंतर जानकर आपल्या आमदारकीचा राजीनामा (Resignation) निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
याबाबत माध्यमांशी बोलतांना जानकर म्हणाले की, माळशिरस तालुक्यातील (Malshiras Taluka) मारकडवाडी आणि धानोरे गावातील मतदारांनी ग्रामसभा घेत स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत. त्यानंतर २३ जानेवारी रोजी या दोन्ही गावातील मतदारांचे प्रतिज्ञापत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर केले जाणार आहेत. त्यात त्यांनी पुन्हा मॉक पोलसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. तर नुकतेच धानोरेमधील मतदारांनी (Voter) हात वर करून मतदान केले आहे. त्यात १२०६ मतदारांनी हात वर केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष ९६३ मते मिळाली होती. त्यामुळे जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर आमदार उत्तम जानकर हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे देणार आहेत.
दरम्यान, याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पोटनिवडणूक जाहीर न केल्यास आमदार उत्तमराव जानकर व माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनास बसणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात ईव्हीएमचा (EVM) मुद्दा तापण्याची शक्यता आहे.