मुंबई | Mumbai
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज (बुधवारी) नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Sessions Court) हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली. तसेच उद्या (गुरुवारी) दुसऱ्या गुन्ह्यात खरात याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणानंतर खरातचे दररोज काळे कारनामे बाहेर येत आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहे. अशातच आता याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर दावा केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली आहे.
रोहित पवारांनी (Rohit Pawar) पोस्टमध्ये म्हटले की, “जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे.
तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या (Maharashtra) भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, असे ते म्हणाले आहेत.
व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवले जात असल्याचा रोहित पवारांना संशय
दरम्यान रोहित पवारांनी दुसऱ्या एक पोस्टमध्ये व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही.के.सिंग याला वाचवलं जात असल्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. यात त्याने म्हटले की, “खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय.असे ते म्हणाले.





