Wednesday, September 2, 2026
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला; म्हणाले, "सत्तेसाठी करोडोंची...

Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला; म्हणाले, “सत्तेसाठी करोडोंची उधळपट्टी, अमित शहा २०२९ ची…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशात आणि महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, ‘नीट’सारख्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत, मुली पळवल्या जात आहेत. एवढे गंभीर प्रश्न देशासमोर असताना आमच्याकडे मात्र काय चाललंय? तर आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडणे! सत्ता टिकवण्यासाठी वाटेल तितके पैसे मोजायला हे तयार आहेत, माणसे विकली जात आहेत, अशा तीव्र शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या (MNS) विशेष मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अमित शहा यांच्या नावाचा उल्लेख करत खळबळजनक दावा

ठाकरे गटाचे खासदार भाजपऐवजी शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? यावर भाष्य करताना राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या नावाचा उल्लेख करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, “अमित शहा हे आत्तापासूनच २०२९ ची स्वतःसाठी तयारी करत आहेत,” असा थेट दावा राज ठाकरेंनी केला. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

५०-१०० कोटींसाठी विकल्या जाणाऱ्यांना पुन्हा निवडून देणार का?

राज ठाकरेंनी जनतेला आणि मतदारांना थेट सवाल करत अंतर्मुख होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्यासाठी तुम्ही उन्हातान्हात दोन-दोन, तीन-तीन तास रांगेत उभे राहता, तो माणूस जर पन्नास-शंभर कोटींसाठी विकला जात असेल, तर जनता म्हणून तुमची प्रतिक्रिया काय? स्वाभिमान गेला की उरतात फक्त जिवंत प्रेत! आज भारतीय जनता पक्षाकडून हे सुरू आहे, उद्या दुसरा पक्ष करेल. या पळवापळवीच्या राजकारणात आपण महाराष्ट्राचे अस्तित्व, स्वाभिमान आणि परंपरा विसरून चाललो आहोत, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.

देश गंभीर संकटात, पण सत्तेसाठी करोडोंची उधळपट्टी!

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी देशातील वाढत्या आत्महत्यांच्या आकडेवारीचा अहवाल मांडला. ते म्हणाले की, लहान मुले आणि मुली पळवून त्यांचे व्यापार केले जात आहेत. त्यांना वेश्या व्यवसायासाठी परदेशात पाठवले जात आहे. हे सगळे प्रश्न आ वासून उभे असताना, सत्ताधाऱ्यांना फक्त आपली खुर्ची टिकवायची आहे. तुमच्या मताची किंमत आज शून्य झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर टोला लगावताना ते म्हणाले की, हे सगळं ऐकलं तेव्हा वाटलं, बरं झालं आपला खासदार निवडून नाही आला, असे त्यांनी सांगितले.

…तर आंदोलन मतपेटीपर्यंत पोहोचवा!

मनसे सैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, नुसती वरवरची आंदोलने करून चालणार नाही. जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल, तर सत्तेचा मार्ग मतदार यादीतून जातो. आज आपली आंदोलने लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा असेल, तर आपल्या हातात सत्ता असायला हवी, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

काही मुनी भाजपच्या दावणीला

मुंबईत ठिकठिकाणी जैन मुनींकडून पांढरे पट्टे मारले जात आहेत, यावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले. ते म्हणाले की,संपूर्ण जैन समाज असा नाही, वर्षानुवर्षे अनेक जैन लोक इथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. प्रत्येक धर्माविषयी आणि उत्तम काम करणाऱ्या मुनींबद्दल मला आदर आहे. पण काही जण जे आहेत, त्यांच्यातले काही मुनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी (दावणीला) लागले आहेत. तिथून ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून तुम्हाला (जनतेला) मूळ प्रश्नांवरून भरकटवून अशा वादात अडकवून ठेवता येईल, असा थेट आरोप त्यांनी केला. एका मुनींचा उल्लेख करत, तो एक जण आहे, त्याला मुनीही म्हणत नाहीत, कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरतो, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावरील सोनसाखळी लुटीचा तीन दिवसांत छडा; पाच आरोपी अटकेत

0
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 18 जवळ हडसपिंपळगाव येथे वाहन अडवून चालकाला मारहाण करत गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून...