नाशिक | Nashik
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या काल (रविवारी) एका कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आल्या होत्या. यावेळी बोलतांना त्यांनी ‘गोपीनाथ मुंडेंवर (Gopinath Munde) प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर वेगळा एक पक्षच उभा राहील’, असे विधान केले होते. मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले की,” २००२ सालची गोष्ट असेल, एकदा गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) माझ्याकडे आले आणि म्हणाले एक वेगळा पक्ष काढू. तुम्ही, मी आणि गणपतराव देशमुख, आठवले एक पक्ष काढू. पक्ष चांगल्या रीतीने पुढे जाईल, मी उपमुख्यमंत्री होतो मला राजीनामा द्यावा लागेल. ते उपनेते होते त्यांना राजीनामा द्यावा लागेल म्हटले. मी सांगितले मला काही हरकत नाही. ओबीसींचाच मुद्दा घेऊन मी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. ओबीसी अथवा मागासवर्गीयांचा अथवा इतर लहान घटकांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही. मग काय झालं माहित नाही, मुंडेंनी नंतर तो विषय सोडून दिला”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “स्वतंत्र पक्ष कुणीही काढू शकतो, पंकजा मुंडे म्हणतात त्याप्रमाणे मोठा पक्ष असू शकतो. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि यश मिळवणं हे कितपत यशस्वी असेल याची मला कल्पना नाही, मग तो कुठलाही समाज (Society) असो. स्व.गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावर भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,” देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटत असतात, एकनाथ शिंदे पण त्यांना भेटतात. कदाचित त्या निवडणुकांसाठी चर्चा आहे की काय? मला काही कल्पना नाही पण असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने ही भेट असू शकेल”, असे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगेंनाही सुनावलं
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विकास खेडकर याच्यासह नऊ जणांना मराठवाडा पोलिसांनी चार जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “मी ऐकलं आहे, काय आपेक्षा आहे हे मला माहीत नाही. मात्र, फडणवीसांनी कोणा-कोणाला पकडलं पाहिजे हे त्यांना विचारावं! फडणवीस काय कोणाला आर्डर देत नाहीत. पोलिस करतात, काय करायचे ते डायरेक्ट! प्रत्येक गोष्टी गृहमंत्र्यांना विचारली जात नाही. स्थानिक पातळीवर जे-जे दोषी असतात, त्यावर पोलिस कारवाई करतात. ज्यावेळी आपण म्हणतो, कडक कारवाई करा, त्यावेळी अशीच ही कारवाई होते”. असे छगन भुजबळांनी म्हटले.