मुंबई | Mumbai
महायुती सरकारमधील (Mahayuti Government) मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांचा बेडरुमधील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग सापडली होती. तर पावसाळी अधिवेशनादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील नोकरास मारहाण केली होती. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळ सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले.
त्यावरून विरोधकांनी सरकारला (Government) कोंडीत पकडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सर्व मंत्र्यांना तंबी दिली आहे. यापुढे अशा चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे म्हणत फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्ट इशारा दिला.
दरम्यान, मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० मिनिटे सर्वच मंत्र्यांना (Ministers) काही सूचना केल्या. यात वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. तसेच असेच प्रकार होत राहिले तर सरकारची बदनामी होते. त्यामुळे ही शेवटची संधी आहे. यानंतर काय कारवाई करायची ती करूच,पण पुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना वार्निंग दिली. तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.





