मुंबई | Mumbai
शेतकरी कामगार पक्षाच्या (Shetkari Kamgar Party) वर्धापनदिनानिमित्त पनवेलमध्ये (Panvel) मेळावा पार पडला. या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हजेरी लावली. शेकापचे माजी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज ठाकरेंना पक्षाच्या वर्धापन दिनाचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी या मेळाव्याला हजेरी लावत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली.
यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “शेकापच्या व्यासपीठावर मी दुसऱ्यांदा येत आहे. पक्षाचा विचार न करता मराठीचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा चांगले रस्ते आले आहेत तेव्हा राज्य सरकारचे लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात (Maharashtra) लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल, शिकवता येईल याचा विचार करतांना दिसत आहेत. मात्र महाराष्ट्रात कामधंदा करायला जे येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार करत नाही. महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि भूमिपुत्रांचा विचारच नाही. याचं विदारक स्वरुप म्हणजे रायगड जिल्हा”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “रायगडातील (Raigad) अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुठे चालल्या माहिती नाही. जमिनीचे व्यवहार करणारे आपलेच, कुंपनच शेत खात आहेत. उद्योगधंदे याठिकाणी येत आहेत आणि लोक बाहेरून आणले जातील. शेतकरी आणि कामगार दोन्ही उद्ध्वस्त होत आहेत. रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी हाती घेतली पाहिजे. येथील मराठी माणूस, शेतकरी, उद्योगधंदे यावर मराठी माणसाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे”, असेही त्यांनी सांगितले.
तसेच “पंतप्रधान (PM) असो किंवा या देशाचे गृहमंत्री, दोघंही गुजराती आहेत. ते ठणकावून सांगतात की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मी विचारलं गुजरातमध्ये आहे का हिंदी? नाही, मग महाराष्ट्रात का आणता? तुमची जमीन गेली की तुम्हाला स्थान नाही. तुम्ही गुजरातला गेलात तर तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही. प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असते. मग फक्त आम्ही त्याविषयी बोललो तर संकुचित कसे ठरतो”, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे?
रायगड जिल्हा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. कल्याणच्या सूभेदाराची सून खणानारळाने ओटी भरणाऱ्या आपल्या राजा शिवछत्रपतींची राजधानी येथे आहे. तिथे डान्सबार सुरू आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य संमेलन भरवतं आहे, हे नुसते गुजराती माणसाबद्दल प्रेम नाही. त्यातून मराठी माणूस आणि गुजराती माणसांमध्ये भांडण लावावी यासाठी केलेले हे उद्योग आहे. तुम्हाला हवे ते आम्ही करणार नाही परंतु ज्यावेळी समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळी अंगावर येऊ. कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे त्यावर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तुम्ही विकले जात असून, पायाखालची जमीन निसटत आहे. भाषा जात आहे मग कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे – राज ठाकरे
शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे श्रीपाद अमृत डांगे हे उपस्थित होते. ते कम्युनिस्ट पक्षाचे होते. तेव्हा शिवसेना आणि कम्युनिस्टांमधून विस्तवही जात नव्हता. मात्र, त्यावेळचे राजकारणी मोठ्या मनाचे होते. आता राजकारण्यांची मनं संकुचित झाली आहेत. त्यावेळी श्रीपाद अमृत डांगे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावर येणे म्हणजे, गव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होते. त्यानंतर आजची घटना म्हणजे आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज आले आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले.




