मुंबई | Mumbai
विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स आता संपण्याची चिन्हे आहेत. उद्या म्हणजेच ३० एप्रिलला विधान परिषदेच्या जागेच्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना मविआकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाहीये. अशातच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिलिंद नार्वेकर काय म्हणाले?
भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर म्हणाले की, ” पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उमेदवार असतील याची ९९ टक्के खात्री आहे. पण ठाकरे असल्याने उरलेल्या एक टक्क्याबद्दल सांगता येत नाही. तरीही ‘बॉस इज ऑलवेज राईट’ हे विसरून चालणार नाही.” नार्वेकरांच्या या विधानाचा रोख स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीकडे आहे.
पडसाद : आणखी एका कांदा समितीचा घाट
शिवसैनिकांची मागणी
महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानपरिषदेवर जावे, अशी चर्चा जोर धरत आहे. मविआतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने देखील या आधीच उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर ही अद्याप उद्धव ठाकरे यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. तर, उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस आपला दावा या जागेवर सांगण्याची चिन्हे आहेत.
अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक
विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. भाजपच्या पाच उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडी आपला पत्ता कधी उघडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिलिंद नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे मानले जात आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहेत. सध्या विधानसभेत असलेल्या संख्याबळानुसार, भाजप ५, शिवसेना शिंदे गट २ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक उमेदवार आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होईल. महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे मविआकडून कोण उमेदवार असेल याची चर्चा जोर धरत आहे.





