मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा (Mahayuti Government) पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना (MLA) मंत्रिपदाची शपथ घेतली. यात ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश असून त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने माध्यमांसमोर बोलतांना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण नाराज असल्याचे म्हणत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला डावललं काय आणि फेकलं काय, कितिदा मंत्रिपद आले गेले पण भुजबळ संपला नाही, असे म्हटले. तसेच मला मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याचे बक्षिस मिळाले आहे, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत भुजबळांवर जोरदार पलटवार केला आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, ” भुजबळ नाराज आहेत की नाही, याचे मला काहीही देणंघेणं नाही. तो प्रश्न त्यांच्या सरकारचा आहे. मला राजकीय विषयात पडायचे नाही, माझ्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ते डोनाल्ड ट्रम्पची जागा घेऊ द्या, मला काही करायचे नाही. ते कुणीकडेही बरळत असतात, त्यामुळे ते प्युअर येडपट आहेत “, असे म्हणत त्यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले.
तसेच मी माझ्या मराठा समाजाचा (Maratha Community) सामान्य कार्यकर्ता असून मला मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असे आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही जरांगेंनी यावेळी व्यक्त केली. याशिवाय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.