Monday, June 22, 2026
Homeमुख्य बातम्याChhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक; २६ हून अधिक...

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक; २६ हून अधिक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली | New Delhi

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नारायणपूर जिल्ह्यातील (NarayanPur District) अबुझदमदच्या जंगली भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये (Security Forces and Maoists) चकमक सुरु असून, या चकमकीत २६ हून अधिक माओवादी ठार झाले आहेत. या सर्व माओवाद्यांचे मृतदेह आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दंतेवाडा, नाराणपूर आणि बीजापूर जिल्ह्याच्या सीमाभागात ही चकमक सुरू आहे. तसेच या कारवाईदरम्यान एक जवान शहीद तर एक जवान जखमी झाला आहे.

- Advertisement -

नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार (Prabhat Kumar) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. अबुझमद भागातील माड परिसरात माओवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक माओवाद्यांविरोधी कारवाई करण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी झालेल्या चकमकीत २६ हून माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

तसेच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा (Vijay Sharma) यांनी नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली. तसेच या चकमकीत काही मोठे नक्षलवादी मारले गेले असून, या कारवाईदरम्यान एक शहीद झाला आहे तर एक जवान जखमी झाल्याचे त्यांनी एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले. सध्या घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे.

दरम्यान, या कारवाईत एकूण २१४ नक्षलवादी लपण्याची ठिकाणे आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर शोधमोहिमेदरम्यान एकूण ४५० आयईडी, ८१८ बीजीएल शेल, ८९९ कोडेक्स, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय जवळपास १२ हजार किलोग्रॅम अन्नसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांचा मोस्ट वाँटेड लीडर ठार

सदर चकमकीत नक्षलवादी संघटनेचे सरचिटणीस वसवा राजू याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वसवा राजू हा खूप जुना नक्षलवादी नेता आहे. दंडकारण्यामध्ये नक्षलवादी संघटनेचा पाया रचणाऱ्यांपैकी तो एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो माडमध्ये आश्रय घेत होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे आंतरराज्यीय बक्षीस होते. सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या सर्वांत गुप्त ठिकाणांवरच हल्ला केला. बसवराजचा देशभरातील सुरक्षा एजन्सी कसून शोध घेत होत्या. अखेर त्याला आता डीआरजी दलांनी ठार मारल्याचे समजते.

ताज्या बातम्या