
जुन्नर | Junnar
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवर दाखल झालेत. मात्र, जरांगे पाटलांना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आज सकाळी सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. दोघे मिळून जरांगे यांची समजूत काढणार. मात्र, सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यापूर्वीच जरांगे यांनी थेट आपली भूमिका स्पष्ट केली असून ते आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल होताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली पाहिजे, असे म्हणाले. तसेच आम्ही मुंबईला जाणारचं, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, असेही मनोज जरांगे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. अशी एक दिवसाची परवानगी देणे म्हणजे गोरगरिबांची चेष्ठा आहे. काहीच होऊ नये, म्हणून तुम्ही जाणूनबुजून एकच दिवसाची परवानगी दिली. गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, मने जिंकण्याची तुम्हाला संधी आलीये. कधीच मराठा समाज तुम्हाला विसरणार नाही. एक दिवसाची परवानगी दिली, त्यामुळे मराठा समाजात नाराजी असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सगळ्या महाराष्ट्रासमोर असे सिद्ध करायचे होते की त्यांनी तर आंदोलनाला परवानगी दिली. पण यातून महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला आहे. ते न्यायालयाकडे बोट दाखवत होते. पण शेवटी परवानगी त्यांनीच दिली. त्यामुळे ते एक दिवसाचीही परवानगी देऊ शकतात आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंतही आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण त्यांनी जाणूनबुजून एकच दिवसाची परवानही दिली. तुम्ही मोठे मन दाखवायला हवे होते”, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
अजूनही संधी आहे या संधीचं सोनं करा
“यांचे बहुमताचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलं आहे. तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली, तर येणारे दिवस तुमचं राजकीय करिअर बरबाद करणारे असतील. मी वारंवार सांगितलंय, आजही तेच सांगतोय.. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा, असे मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असेही मनोज जरांगेंनी म्हणाले. मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरुन सांगतो…देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




