पुणे (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझरची मागणी प्रचंड आहे. त्या प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध ठेवण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेत सॅनिटायझर निर्मिती सुरू केली आहे.
प्रशासनाकडून यासाठी राज्यातील ४३ साखर कारखाने आणि कंपन्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील १५ , सांगली जिल्ह्यातील ४, सातारा जिल्ह्यातील ९, सोलापूर जिल्ह्यातील ११, कोल्हापूर जिल्ह्यातील ३, नाशिक जिल्ह्यातील ५, अहमदनगर जिल्ह्यातील ८, पालघर ७, औरंगाबाद जिल्ह्यातील ४, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५, नागपूर जिल्हयातील २, तर जालना, बीड, परभणी, लातूर, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी एका साखर कारखान्याचा समावेश आहे.
या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा, पोलीस सुरक्षा यंत्रणा, सफाई यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांना मोफत सॅनिटायझर काही साखर कारखान्यांकडून पुरविले जात आहे. या कारखान्यांमधून क्षमतेनुसार २ हजार लिटर प्रतिदिनपासून १ लाख २० हजार लिटर प्रतिदिन सॅनिटायझर निर्मिती होत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत, त्यांना वारंवार निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने आता साखर कारखान्यांच्या माध्यमातून सॅनिटायझर निर्मिती केली जात आहे.




