मुंबई | Mumbai
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची कितीही दिवस मुंबईत राहण्याची तयारी असल्याचे म्हटलेय. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला मराठा आंदोलकांचाही पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पाठिंबा दिला आहे.
अभिनेता रितेश देशमुख म्हणाला, सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा… श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडणारच. मराठा आरक्षणाच्या लढ्यात गोळ्या घातल्या तरी विजयाशिवाय मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून कोणीही हलणार नाही, असा निर्धार मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे व्यक्त केला. जाळपोळ, दगडफेक, अवाजवी गोंधळ तसेच मुंबईकरांना त्रास होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक आंदोलकाची आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी समाजाच्या एकजुटीची गरज आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या मागण्यांसदर्भात सरकार काय भूमिका काय घेत? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात अनेक ओबीसी नेते देखील बोलताना पाहायला मिळाले आहेत. ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंच्या मागण्यांना कडाडून विरोध केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




