मुंबई | Mumbai
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि स्टार कपल अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर (कोठारे) (Adinath Kothare and Urmila Kothare) यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्याने उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांवर आता पूर्णविराम मिळाला असून, या दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोट (Divorce) घेत असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावरील एका संयुक्त पोस्टद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि हितचिंतकांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
१६ वर्षांच्या संसारानंतर घेतला निर्णय
आदिनाथ आणि उर्मिला यांची पहिली ओळख ‘शुभमंगल सावधान’ या मराठी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात दोघांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या (Wedding) तब्बल सोळा वर्षांनंतर या दोघांनी परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय
घेतला आहे.
मुलगी ‘जिजा’चे मिळून करणार संगोपन
आदिनाथ आणि उर्मिला पती-पत्नी (Husbend and Wife) म्हणून वेगळे होत असले तरी आई-वडील म्हणून आपल्या मुलीप्रती असणारी जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “आमची मुलगी जिझा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत.” असे ते म्हणाले.
चाहत्यांकडून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
दरम्यान गेल्या काही काळापासून त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगत होत्या, मात्र आज त्यांनी स्वतःच पोस्ट (Post) शेअर करत यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या या निर्णयावर चाहत्यांकडून आणि सिनेसृष्टीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटले?
आदिनाथ आणि उर्मिला यांनी इन्स्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर करत लिहिले आहे की. “आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ महेश कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत.
गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जे भरभरून प्रेम आणि साथ दिली आहे, त्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे. म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आदिनाथ आणि ऊर्मिला




