संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्याच्या पठारभागातील बोटा, घारगाव परिसरात रविवारी (दि.14) सायंकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या परिसराला यापूर्वी देखील वारंवार अशाचप्रकारचे धक्के बसल्याच्या घटना घडल्या असून नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेत त्याची नोंद झाली होती. त्यावेळी मेरी संस्थेचे शास्त्रज्ञ, तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. रविवारी पुन्हा एकदा हे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा धक्का बसल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फोनद्वारे चर्चा सुरू झाली.
अचानक असा थरथर आवाज आला, प्रथम वाटले की कोणी ब्लास्टिंग केले आहे, पण नंतर समजले की आसपासच्या गावांनाही धक्का बसला आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. दरम्यान, 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याचे भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले. मात्र, नागरिकांनी सतर्क राहून घाबरुन जावू नये, असे आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.





